ऐका हो ऐका !!
“हे बरे झाले.” भगवान विष्णू दवंडी ऐकून म्हणाले. “रोज केवढा तो गोंगाट, हॉर्नचा आवाज , कोणीही कशीही , मनात येईल तशी गाडी चालवतो , थांबवतो , उभी करतो. आता अशा बेशिस्त चालकांना तिप्पट दंड केला कि काहीतरी सुधारणा होईल , काय मुनीवर ?”
नारद मुनी (गालातल्या गालात हसत ) , “ सुधारणा होईल ना. नक्की होईल पण ती पोलिसांच्या राहणीमानात.”
भगवान प्रश्नार्थक नजरेने महामुनिंकडे पाहतात .
नारद मुनी , “ भगवन, मागच्या महिन्यातील दवंडी आठवते का तुम्हाला ? मुख्यमंत्री (अ)शोकरावजी चव्हाण, यांनी जाहीर केले कि पोलिसांच्या राहणीमानात सुधार करणार , त्यांची जीवनशैली चांगली करण्याला प्राधान्य देणार.”
भगवन अजून confuse… “ महामुनी , नक्की काय म्हणायचेय तुम्हाला ?”
नारद मुनी ,” भगवन , पोलिसांचे राहणीमान सुधारण्यासाठी , त्यांची जीवन शैली चांगली करण्यासाठी द्रव्य लागते. ते आहे कुठे राज्याच्या तिजोरीत ? राज्याच्या तिजोरीत कित्येक वर्ष खडखडाट आहे ….सगळे उसनवारीवर चालू आहे ? परंतु दिलेला शब्द पाळायला नको का ? म्हणून (अ)शोकरावांनी हि शक्कल काढली.”
भगवन - “म्हणजे ?”
नारद मुनी ,“भगवन , दंड तिप्पट केला असे म्हणाले ते , वसूल करू असे कुठे म्हणाले ? अहो , १०० रुपये दंड होता. तो वसूल न करता तडजोड केली कि ५० रुपयात काम भागायचे दोघांचे. नियम मोडनार्याची ५० रुपयांची बचत आणि पोलिसाचा ५० रुपयांचा फायदा. पण आता महागाई किती वाढलीये. साखर , तुरडाळ, कांदा , भाज्या, सगळ्या जीवनावश्यक गोष्टी भयंकर महाग झाल्यात. त्यात पोलिसांचे पगार तुटपुंजे म्हणून त्यांनी आबा आणि (अ)शोकरावांकडे भुण-भुण लावली. त्यातून (अ)शोकरावांनी हि शक्कल काढली.”
“दंडच तिप्पट केला , आपसूकच नियम मोडल्यावर होणार्या तडजोड रक्कमेत वाढ झाली. ५० रुपयांची कमाई तिप्पट होऊन १५० झाली. पोलिसांची कमाई वाढली कि त्यांचे राहणीमान आपोआप वाढणार आणि जीवनशैलीही सुधारणार आणि ते हि या सर्व खर्चाचा बोजा सरकारी तिजोरीवर न पडता.”
भगवन – “आयला !! (जीभ चावत)….वा !! काय डोके आहे या (अ)शोकरावांचे !!”
- राजन महाजन
१४ जानेवारी २०१०